Showing posts with label मेळघाटच्या कविता : जयंत गायकवाड. Show all posts
Showing posts with label मेळघाटच्या कविता : जयंत गायकवाड. Show all posts

मेळघाटच्या कविता : जयंत गायकवाड

 



संवेदना जेव्हा शब्दरूप होऊन व्यक्त

होतात तेव्हा अभिजात निर्मिती होते.

संवेदना ही अनुभूतिच्या प्रतिक्षेत असते.

त्या संवेदने मागे असते अनुभवाची अनुभूती.

अनुभूती ही शब्दरूपाने कविता होते. रंगाचे आवरण 

घेऊन चित्ररूप होते

आणि दगडाचे आवरण घेऊन शिल्प.

संवेदनेला अनुभवाची प्रतिक्षा असतेच. 


#श्री. श्रीकृष्ण राऊत सरांची ही अनुभुती काव्यग्रंथ स्वरूपात हातात घेतांना शब्दांचा सुगंध कसा असतो,  कसा स्पर्श करतो

आणि अंतर्मनाला किती संवेदनेचे हिंदोळे घालतो याची जाणीव झाल्या वाचुन राहत नाही. शब्दांची सहजता अणि अर्थाची सुंदरता संदर्भाच्या गहन अरण्यातून सहज बाहेर काढते तेव्हा अभिजात 

कलाकृती काय असते हे आपसुकच कळते.


‘मेळघाटच्या कविता’ हे राऊत सरांचे सिद्धहस्त हस्ताक्षरच आहे.  एक एक कविता संपूर्ण कथानकच आहे. ह्या कविता वाचतांनाआपल्या जाणीवांच्या कक्षा रूंदावत जातात आणि आपल्यालाही समृद्ध करतात.

नदी जशी ओल्या गाळाने प्रदेश सुपिक करित जाते तशी सरांच्या शब्द माधुर्याने मन तरल होते. नवे शब्द गवसतात आणि त्यांच्या अर्थाने एक नवे दालन उघडल्या जाते.    


सरांच्या काव्यग्रंथाकरिता आवरण पृष्ठ करतांना मलाही त्यांच्या शब्दाच्या संवेदनेशी एकरूप व्हावे लागले. आदिम जीवनाच्या प्रतिकांना मुखपष्ठावर समावून व्यक्त होता आले.


जयंत गायकवाड। चित्रकार। अक्षरकार